Tuesday, February 10, 2015

गृहीत का धरता ?

 एकमेकांना मदत करणं नेहमीच चांगलं असतं. किंबहुना ते निरोगीपणाचे लक्षण आहे, परंतु जेव्हा ते गृहीत धरणं होतं आणि समोरच्या व्यक्तीवर लादलं जातं तेव्हा मात्र त्याच्यासाठी ते त्रासदायक ठरू शकतं. अन्यथा मित्राने अडचणीच्या वेळी केलेली पैशांची मदत असो की शेजाऱ्यांकडे विश्वासाने ठेवायला दिलेली आपल्या घराची चावी असो अशा गृहीत धरण्यावरच तर आपलीं नाती समृद्ध होत असतात.
'आ जोबांचे वय 'क्ष' वर्षे, आणि समीरच्या गाडीचा वेग 'य' किलोमीटर तासाला.' असे गृहीत धरून गणित सोडविताना बाईंनी दोन समीकरणे फळ्यावर लिहिली. पटापट सोडवली. 'क्ष' आणि 'य' च्या किमती बरोबर काढून गणित सुटले, उत्तर बरोबर. गुण मिळाले पैकीच्यापैकी. असेच 'क्ष, य' गृहीत धरून आयुष्याचे गणित सुटले तर? तिथे गृहीत धरणे आहे, पण गणित सुटेल याची खात्री शून्य. असं अनेकदा होताना दिसतं. नातं कुठलंही असो, एकजण दुसऱ्याला गृहीत धरतो. त्याच्याजवळ आदर, माया,  दखल, किमान केलेल्याची जाणीव, दोन शब्दांचा उच्चार,  कौतुक काही काही नसतं. असतं ते फक्त गृहीत धरणं!
अगदी साध्या साध्या गोष्टींत अनेक जण दुसऱ्याला गृहीत धरतात. रवीला दररोज सकाळी वर्तमानपत्र वाचायला लागायचं. पण रोज सकाळी कोण बाहेर जाणार त्यासाठी? त्याने सरळ सकाळी फिरायला जाणाऱ्या शेजारच्या आजोबांना विचारलं आणि त्यांनीही ते सहज मान्य केलं. त्या दिवसापासून आजोबा नित्यनेमाने रवीसाठीही वृत्तपत्र आणू लागले. एकदा सकाळीच आजोबांना ओळखीचे गृहस्थ भेटले आणि बोलता बोलता उशीर झाला. इकडे रवी अस्वस्थ झाला. रोजची सवय पडलेली. चिडचिड व्हायला लागली. तशातच तो ऑफिसला निघाला. गाडी बाहेर काढत असताना आजोबा दिसले. मागचा पुढचा विचार न करता रवी चिडून मोठय़ांदा म्हणाला, ''किती उशीर? मला ऑफिसला निघायचं असतं पेपर वाचून, माहीत नाही का?'' आजोबा क्षणभर शांत राहिले. मग ''इतके दिवस आठवणीने आणि वेळेत आणत होतो ना पेपर. एखाद् दिवस होऊ शकतो उशीर. तू आता हे जे काही म्हणालास ते म्हणजे मी तो तुझ्या वेळेतच आणला पाहिजे हे तू गृहीत धरलंस. मला तुझ्या ऑफिस वेळेची कशी कल्पना असणार. त्यामुळे यापुढे मी कधीही वर्तमानपत्र आणणार नाही.'' असं म्हणत ते पेपरसह वरती निघून गेले.
             खरं तर नात्यांपलीकडेही आपण अनेक गोष्टी गृहीत धरत असतो. सूर्याने प्रकाश द्यायला हवा, मेघांनी पाऊस पाडायलाच हवा, घडय़ाळाने योग्य वेळ दाखवायलाच हवी, हृदयाने टिकटिक करायला हवी, पण जेव्हा हे सगळं विरुद्ध होतं तेव्हा आपल्याला त्या त्या गोष्टीची किंमत कळते. म्हणूनच आपण एखाद्या गोष्टीला वा व्यक्तीला फार गृहीत धरत नाही ना हे पाहायला हवं.  एकमेकांना मदत करणं नेहमीच चांगलं असतं. किंबहुना ते निरोगीपणाचं लक्षण आहे, परंतु जेव्हा ते गृहीत धरणं समोरच्या व्यक्तीवर लादलं जातं तेव्हा मात्र त्याच्यासाठी ते त्रासदायक ठरू शकतं.
             बहुसंख्य ऑफिसमध्ये असा एखादा 'नारायण' असतोच. ज्याला अनेक जण अगदी बॉसपासून चतुर्थ वर्ग कर्मचाऱ्यापर्यंत अनेक जण गृहीत धरतात. परंतु काही वेळा त्याची श्रीसारखी अवस्था होते. श्रीला सगळेच गृहीत धरायचे. त्यामुळे सगळे जण आपलं काम त्याच्यावर सोपवून चक्क सिगरेटी फुंकायला बाहेर पडायचे. इतकंच नाही तर महिला वर्गही आपले अर्धवट काम त्याच्यावर सोपवून गाडी पकडायला धावायच्या. आणि श्री मात्र रात्र रात्र थांबून ते काम पूर्ण करायचा. नव्याने रुजू झालेल्या संयुक्ताच्या हे लक्षात आलं.  तिला श्रीचा साधेपणा भावला, पण लोक गृहीत धरून घेत असलेला त्याचा फायदा तिला खटकायला लागला. काही महिने गेल्यावर मात्र तिने हळूहळू त्याच्या हे पचनी पाडायला सुरुवात केली. ''मदत करायला हरकत नाही. करच तू. जे अडतील, ज्यांना गरज असेल त्यांच्यासाठी पुढाकार नक्की घे, परंतु लोकांनी तुला गृहीत धरणं योग्य नाही. आणि इतकं करून कोणी कौतुकही किंवा आदर तरी देतं  का उलट 'ते काम करून ठेव रे, असे आदेश ते कसे काय देऊ शकतात? तू कुणाचाही नोकर नाहीस. प्रत्येकाला आपापल्या कामाचा पगार मिळतो. त्यामुळे एखादा दिवस ठीक आहे, पण  दरवेळी वर्षांमॅडमची बॅलन्सशीट तूच का टॅली करून द्यायची?''
श्रीला संयुक्ताचं म्हणणं पटत होतं. तो म्हणाला, ''पण नाही कसं म्हणणार?''
                 ''तोंडाने. अगदी थेट. तुझा आत्मसन्मान हा तुझा आहे. तो टिकवणं हे फक्त तुझ्या हातात आहे. कोणी गृहीत का धरावं तुला? तू प्रेमाने सगळ्यांचं करतो म्हणून? आणि इतकं करून काल तू एक शंका विचारायला गेलास माधवीला तर कसं उडवून टाकलं तिने तुला? हे वाईट.  तू हुशार आहेस. थोडासा स्मार्ट हो. तू काहीही बोलणार नाही हे गृहीत धरून लोक तुझ्याशी कसंही वागतात, ते तू चालवून घेऊ नकोस. तुझ्याच लक्षात येईल. त्यांच्या नजरेत तू खूप खूप वर असशील.''
               श्रीला संयुक्ताचं म्हणणं थेट भिडलं. रात्रभर तो विचार करत राहिला. आपणच आपल्याला गृहीत धरणं थांबवू शकतो हे त्याला मनोमन पटलं. दुसऱ्या दिवशी तो ऑफिसला गेला तो काही निर्णय घेऊनच. वर्षांबाईंनी नेहमीप्रमाणे बॅलन्स शीट त्याच्या टेबलवर सरकवली. तसं शांतपणे हसत तो त्यांना म्हणाला, ''फॉर अ चेंज वर्षां मॅडम, या महिन्यात बॅलन्स शीटचं काम तुम्हीच केलंत तर?''