Showing posts with label Youngistan. Show all posts
Showing posts with label Youngistan. Show all posts

Monday, January 14, 2013

आवड आवड असते !



आवड आवड असते !

आ युष्य मजेत जावे असे कुणाला वाटत नाही? फक्त ही मजा आपल्या शरीरातूनच उत्पन्न होते, हे मात्र बऱ्याचजणांना माहीत नसते. म्हणजे असे बघा- तुम्ही महाबळेश्वरला गेला आहात. हवा मस्त आहे. सगळे मस्त बागडताहेत, पण तुमचे पोट साफ झालेले नाही आणि तुमच्या पृष्ठभागाला एक गळू झालेले आहे आणि ते ठसठसते आहे. सारी मजा गेलीच म्हणून समजा. तर ही मजा आपल्याला सदैव घेता यावी यासाठी आपल्याला स्वत:कडे लक्ष देणे आवश्यक असते. हे आपण आपल्या जीवनशैलीत बदल करून करू शकतो. असे केले की, मजा करावी लागत नाही, मजा येत राहते.
'जीवनशैली' हा शब्द 'लाइफस्टाईल' या इंग्रजी शब्दाचे भाषांतर म्हणून मराठीत योजिला जातो. शैली हा शब्द खरे तर खूपच व्यक्तिगत आहे. म्हणजे 'अमुक अमुक वादकाची शैली' असा प्रयोग आपण करतो. पण सध्याची जीवनशैली असे म्हटले, की एक सामाजिक आशय त्याला प्राप्त होतो. प्रत्येक व्यक्तीने हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे; म्हणजे दुसऱ्यासारखे जगण्याचा प्रयत्न न करता स्वत:सारखे जगण्याकडे लक्ष देणे फार आवश्यक ठरते.
स्वत:सारखे जगायचे म्हणजे कसे जगायचे? तर ज्या जीवनपद्धतीचा अंगीकार केला असता आपले शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्वास्थ्य सुधारत राहते, ती जीवनपद्धती आपल्या दृष्टीने योग्य असे समजायचे. जर का आपल्या स्वास्थ्यास हानिकारक अशा गोष्टी आपण वारंवार करीत असू आणि शरीर-मन आपल्याला दु:ख या संवेदनेतून सांगत असेल तर आपल्याला लवकरात लवकर आपली जीवनपद्धती बदलायला हवी.
आपण जे काही पूर्वसुकृतानुसार शरीर-मन घेऊन जन्माला आलो आणि ज्या परिस्थितीत जन्माला आलो त्या शरीर-मनाचा सवरेत्कृष्ट वापर आपल्याला आपल्या जीवनपद्धतीत करता आला पाहिजे. हे करण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला आवडते ते शिक्षण घेणे. आपल्याला आवडते ते शिक्षण घेता आले म्हणजे पुढे आवडता व्यवसाय करायला सोपे जाते. सध्याच्या काळात आपल्याला काय आवडते ते बघण्याऐवजी पैसे कुठे जास्त मिळतील हे बघितले जाते, हे फार चुकीचे आहे. ज्यात मन लागत नाही ते शिकणे फार अवघड असते. लहानपणापासूनच मुलामुलींचा कल पाहून चतुराईने त्यांना त्यांच्या आवडीच्या विषयात काम करता येईल असे पाहणे महत्त्वाचे ठरते. आपल्या आवडत्या विषयाशी संबंधित असे काम करणे हे योग्य जीवनपद्धतीचे दुसरे वैशिष्टय़.
आपल्या आवडत्या विषयात काम करायला मिळणे ही पहिली पायरी असली तरी त्यापासून उद्भवणारा धोका असा की अविश्रांत काम करण्याची वृत्ती उत्पन्न होऊ शकते. श्रीखंड कितीही आवडले तरी खातच बसले म्हणजे अपचन होणारच. म्हणजे वेळच्या वेळी खाणे थांबवणे जसे आवश्यक तसेच कामही वेळच्या वेळी थांबवता येणे आवश्यक असते. आज रोज १६ ते १८ तास काम करणारे अनेक वेठबिगार संगणकतज्ज्ञ पाहिले की खरोखर वाईट वाटते. एखादे वेळेस अगदी २४ तास काम करणे वेगळे आणि रोज १८ तास काम करणे वेगळे. आता या वयात खूप काम करून खूप पैसे मिळवायचे आणि मग आयुष्य 'एन्जॉय' करायचे असा तद्दन बिनडोक विचार या मागे बहुतांश लोकांचा असतो.
आवडते काम हा एक भाग असेल तर आवडत्या व्यक्तीबरोबर आयुष्य घालवणे हा योग्य जीवनपद्धतीचा तिसरा भाग. चित्रापेक्षा चौकट आवडल्याने जे लग्न करतात, त्यांना आयुष्यात पुढे घरी येताना तणाव उत्पन्न होतो, जसे नावडते काम करणाऱ्यांना कामावर जाताना तणाव उत्पन्न होतो. आणि या दोनही गोष्टी बिघडल्या असतील तर मग विचारायलाच नको.
आवडता छंद जोपासणे हा योग्य जीवनपद्धतीचा चौथा भाग. अगदी मनापासून त्या छंदात मश्गुल होणे हे ध्यानधारणेपेक्षा कमी नाही. वयाच्या साठाव्या वर्षांपर्यंत तुम्ही त्या छंदातले जवळजवळ तज्ज्ञच बनता. मग पुढे या छंदाचे शिक्षण द्यायचा आनंद तुम्ही घेऊ शकता.
आपल्या शरीरमनाची सुयोग्य देखभाल करणे हा योग्य जीवनपद्धतीचा पाचवा भाग. त्यासाठी फक्त स्वत:साठी एक तास काढता येणे फार आवश्यक असते. 'व्यायाम' या शब्दाचीच काही जणांना अ‍ॅलर्जी असते. बिचाऱ्यांना त्यात किती आनंद आहे, हे कधीच कळलेले नसते. त्यामुळे ते त्या वाटेलाच जात नाहीत आणि मग 'स्पाँडिलायटिस' 'आथ्र्रायटिस' अशी लेबले घेऊन ते आयुष्य काढतात. आपल्या शरीरातील ताकद, लवचीकपणा आणि दमश्वास हा कायम वाढता ठेवण्याचा प्रयत्न करणे हे त्यासाठी आवश्यक असते. परिस्थिती जशी आहे तशी पाहता येण्यासाठी सतत भानावर राहण्याची कलादेखील साध्य करायला लागते. २४ तास सुयोग्य श्वासात राहणे हे त्यासाठी उपयुक्त ठरते.
आपण जे खातो, त्याचेच शरीर बनते. त्यामुळे कोणतीही गोष्ट खाताना या गोष्टीचे शरीर होऊ द्यायचे की नाही एवढेच ठरवायचे असते. सामान्यपणे जाहिरात केलेल्या गोष्टी न खाणे अगर पिणे आणि नैसर्गिक पदार्थ जमेल तितके खाणे हे महत्त्वाचे. भूक लागेल तरच खाणे हा सोपा नियम पाळावा.
उत्तम वाहन आणि उत्तम कपडे हे जीवनपद्धतीचे महत्त्वाचे अंग आहे. पण माणसामुळे कपडे अगर वाहन शोभून दिसले पाहिजे. छान तब्येतीची मुलगी अगर मुलगा कुठल्याही वाहनावर आले किंवा सामान्य कपडे पेहरून आले तरी छानच दिसतात. मोराची पिसे लावून कावळा मोर होत नाही, हे आपल्याला माहिती आहे. पण कावळा जर कावळा म्हणून वागला तर देखणाच दिसतो.
सध्याच्या जीवनपद्धतीत मूठ जशी बंद करता आली पाहिजे, तशीच योग्य वेळी उघडताही आली पाहिजे. सामान्यपणे उत्तम खाणे, उत्तम पुस्तके, प्रवास, छंद आणि मदत या गोष्टींवर खर्च केल्यामुळे आयुष्याचा स्तर वाढता राहतो. अनेक मित्रमैत्रिणी मिळतात. आयुष्य श्रीमंत होते. चालताना थांबण्याचे भान, तर थांबल्यावर चालण्याचे भान आयुष्याचा तोल बिघडू देत नाही.
कोणत्याही जीवनपद्धतीत कुणाची कॉपी करणे हे सर्वथैव त्याज्य असायला हवे. मी माझ्या मस्तीत राहणार तर तो त्याच्या मस्तीत राहणार. यात मस्ती या शब्दाचा अर्थ उर्मटपणा अगर मस्तवालपणा असा नाही तर आपल्या लयीत आयुष्य काढणे असा आहे. आपल्या आयुष्याची लय ज्याला सापडली त्याला जीवनपद्धती सापडलीच! आता सारे व्यवस्थित होत राहणारच!
या लेखमालेत वरील सर्व अंगांचा आपण विचार करणार आहोत. वरील मुद्दय़ांसोबत प्रासंगिक अशा काही गोष्टीही यात येतील. स्त्री-पुरुष संबंध ही एक अत्यानंदाची गोष्ट असताना त्याचा पूर्ण विचका झालेल्या समाजात आपण राहत आहोत, हे भान आपल्याला आले तर कमीत कमी पुढच्या पिढीला तरी आपण त्यातून मुक्ती देऊ शकू. मजेने आयुष्य काढणे हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आपण वापरूयात. हा आपला दु:खी समाज आहे, कारण एकमेकाला त्रास देण्यात आपल्याला मजा येते. कुणी सुखात असलेला आपल्याला बघवत नाही. आपल्या दु:खापेक्षा दुसऱ्याचे सुख आपल्याला जास्त दुखते. कुणी मजेत राहतो आहे याचा अर्थ काहीतरी चूक होते आहे असे मानणारे महापुरुष या समाजात आहेत. आयुष्य म्हणजे केवळ दु:ख म्हणून परलोकाकडे डोळे लावून बसलेल्या अज्ञानी लोकांच्या झुंडी इथे आहेत. दु:ख याचा अर्थ माझे काहीतरी चुकते आहे असा न घेता आयुष्य म्हणजेच दु:ख असा अनर्थ काढून मोकळे होणारे काही कमी नाहीत. आपल्या आयुष्यात मजा सतत आली पाहिजे. करायला लागता कामा नये, एवढे कळले तरी खूप झाले.

 
***    स्वप्नील  वाघमारे  ***

Wednesday, August 29, 2012

आकलन : तरुण भारत आणि वयोवृद्ध सरकार

आकलन : तरुण भारत आणि वयोवृद्ध सरकार


जनतेचे वय व सरकारचे वय हे परस्परपूरक असले की देशाचा गाडा सुरळीत चालतो. भारतात आज तरुणांची संख्या सर्वाधिक असली तरी देशाचा गाडा हाकणारे सत्तरीत पोहोचले आहेत.. साहजिकच देश मंदगतीने चालणार. भारत आज जगातील सर्वात तरुण देश म्हटला जातो. जगातील बलाढय़ देशांशी तुलना करता भारतात सर्वाधिक तरुण आहेत. भारताचे सरासरी वय हे अवघे २६ वर्षे आहे. वीस ते तीस या वयांतील सर्वाधिक लोकसंख्या जगात भारतामध्ये आहे. पण भारतामध्ये जोश, सामथ्र्य, नावीन्य, कल्पकता अशी तरुणाईची वैशिष्टय़े फारशी दिसत नाहीत.
उलट हा देश अजूनही धीमेपणे चालणारा, परंपरावादी, आत्ममग्न असा दिसतो. इतके तरुण असलेला देश चैतन्याने रसरसलेला दिसला पाहिजे. परंतु, चैतन्य, धाडस हे गुण क्वचितच कुठे दिसतात.
गुलामगिरीमुळे समाजात मरगळ येते. कर्तृत्व हरवते. या देशाने हजारो वर्षांची गुलामगिरी सहन केली. मुस्लिमांच्या काळात राजकीय तर ब्रिटिशांच्या काळात सांस्कृतिक दास्यातही देश अडकला. कित्येक शतकांच्या गुलामीमुळे जगण्याची रग हा देश गमावून बसला. बंडखोरी या देशातून नाहीशी झाली. सामथ्र्यवान होऊन परकीयांविरुद्ध आवाज उठविण्याऐवजी परकीयांच्या आश्रयाने स्वकीयांना दडपण्याचा सोपा मार्ग या देशातील अनेकांनी स्वीकारला. साहस करावे, मर्दुमकी दाखवावी, नवीन प्रदेशांचा शोध घ्यावा, नवी शास्त्रे शोधून काढावीत, असंख्य प्रयोग करावेत, जीवावर बेतले तरी हरकत नाही, पण अभ्युदयासाठी धाडस करावे ही उमेद या देशात राहिली नाही. हे गुण लखलखीतपणे दाखविणारे शिवाजी महाराजांसारखे काही अपवाद या देशात जरूर निर्माण झाले. पण लवकरच अशा व्यक्ती ही फक्त अस्मितेची प्रतीके बनली. त्यांच्यातील गुणांची समाजात वाढ झाली नाही. त्या व्यक्ती पूजनीय बनल्या आणि समाज पुन्हा स्थितिशील राहिला.
गुलामीच्या काळात तरुणांना संधी मिळाली नाही हे समजण्यासारखे असले तरी स्वातंत्र्य मिळाल्यावर परिस्थितीत फरक पडायला हवा होता. परंतु, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पासष्ट वर्षांनीही परिस्थिती बदललेली नाही. आज देशात सर्वाधिक तरुण असले तरी देशाचे नेतृत्व वृद्धांकडे आहे. स्वातंत्र्य चळवळीत तरुण प्रचंड संख्येने सामील झाले होते. पण स्वातंत्र्य मिळाले तेव्हा सत्तेवर आलेले सरकार हे वयोवृद्धांचेच होते. किंबहुना थकलेल्या नेतृत्वामुळे ब्रिटिशांना वाटाघाटी करणे सोपे झाले असेही म्हटले जाते. त्यानंतरही इंदिरा व राजीव गांधींचा अपवाद सोडला तर भारतातील सरकार हे नेहमी सत्तरीपुढील वृद्धांचे सरकार राहिले.
आजही भारतीय लोकसंख्येचा तोंडवळा पंचविशीचा असला तरी सरकारचा तोंडवळा पासष्ट वर्षांचा आहे. पंतप्रधान मनमोहन सिंग ऐंशी वर्षांचे आहेत. लालकृष्ण अडवाणी यांनी ऐंशी पार केली आहे. याआधीच्या पंतप्रधानांकडे पाहिले तरी नरसिंह राव, अटलबिहारी वाजपेयी यांनी  सत्तरी पार केली होती. मोरारजी देसाई ८१व्या वर्षी पंतप्रधान झाले. राजीव गांधी हे एकमेव तरुण पंतप्रधान.
अन्य देशांशी तुलना करता भारतातील जनतेचे वय आणि सरकारचे वय यातील फरक ठळकपणे लक्षात येतो. चीनमधील सरकारचे सरासरी वय ६०च्या पुढे असले तरी चीनमधील जनतेचे सरासरी वयही ३५ आहे. यावर्षी चीनमध्ये नवे सत्ताधारी येतील. त्यांचे वय साठहून कमी असण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे वयातील ही दरी बुजविण्याचा प्रयत्न चीनमध्ये सुरू आहे. अमेरिकेत हा फरक साधारण वीस वर्षांचा पडतो. अमेरिकेचे सरासरी वय ३८ आहे तर सरकारचे वय ५९ आहे. मात्र अमेरिकेचे अध्यक्ष वयाने जनतेच्या बरेच जवळ आहेत. ओबामा एकावन्न वर्षांचे आहेत. बिल क्लिंटन अध्यक्ष झाले तेव्हा ४६ वर्षांचे होते. आज ब्रिटनचे पंतप्रधान ४५ वर्षांचे आहेत. टोनी ब्लेअर हे ४३व्या वर्षी पंतप्रधान झाले होते. जगातील सधन देशांचा तरुण नेतृत्वाकडे वाढता कल दिसतो. सधन देशांत जनता व सरकार यांच्या वयात फार अंतर नसते. जर्मनी व रशियामध्ये हे अंतर अवघे सात-आठ वर्षांचे आहे तर भारतात तब्बल चाळीस वर्षांचे.
वयामुळे नेतृत्वाच्या क्षमतांना मर्यादा येतात. व्यवसायात माणसाची नेमणूक करताना अनुभवाबरोबर वयाचा विचारही केला जातो. देशाचे नेतृत्व करताना अनुभवाला सर्वाधिक प्राधान्य दिले पाहिजे यात शंका नाही. पण सरकारचा एकूण चेहरा हा जनतेच्या सरासरी वयाशी थोडा तरी जुळणारा नसावा का?
सरकार व जनतेच्या वयामधील फरक वाढला की देशात अस्थिरता येते असे जगभर आढळून आले. बहुसंख्य जनतेच्या आशाआकांक्षांना सरकार त्याच तीव्रतेने प्रतिसाद देत नाही वा वयामुळे देऊ शकत नाही. सध्या भारतात हे जाणवते. सध्याच्या मंदीत बऱ्याच संधी दडलेल्या आहेत असे तरुण वर्गाला वाटते. परंतु या तरुणांना नेतृत्वाची संधी मिळत नसल्याने नव्या कल्पना, नवी धोरणे यांना सरकारी निर्णयात वाव मिळत नाही. वृद्ध नेते जात, धर्म, गट अशा जुन्या कल्पनांना धरून बसतात. कारण त्यामुळे त्यांना सत्ता मिळालेली असते. या जुन्या कल्पना राबवीत सावधगिरीच्या संथ मार्गाने सरकार चालते आणि तरुण वर्गाचा हिरमोड होतो. काही तरी करून दाखविण्याची उमेद तरुण वर्गात असते. ही संधी सत्तेमुळे मिळते. परंतु, सत्तेची पदे तरुणांसाठी मोकळी होत नसतील तर हा वर्ग निराश होतो. पन्नाशीतच मानसिकदृष्टय़ा वृद्ध झालेल्या व्यक्तींची संख्या भारतात सर्वात जास्त असेल. याचे कारण पन्नाशी आली तरी कर्तृत्व दाखविण्याची संधीच या व्यक्तींना मिळालेली नसते. राजकारणच नव्हे तर अन्य क्षेत्रांमध्येही अशीच स्थिती दिसून येते. कर्तृत्वाला पुरेसा वाव मिळत नाही म्हणून तरुण बंडखोर होत आहेत, अशी तक्रार लोकमान्य टिळक ब्रिटिशांकडे वारंवार करीत. आता सरकार आपलेच असल्यामुळे तशी तक्रार कोणाकडे करणार?
पन्नास ते पासष्ट हे खरे तर सत्ता राबविण्यासाठी उत्तम वय असते. या वयात शारीरिक क्षमता चांगल्या असतात. पुरेसा अनुभव गाठीशी असतो. तत्परता असते. धाडस दाखविता येते. याउलट साठी पार झाली की माणसाची शारीरिक क्षमता घटते. त्याचा परिणाम तत्परतेवर होतो. याशिवाय काळजी करण्याची वृत्ती वयाबरोबर बळावते. यामुळे माणूस अधिकाधिक जपून निर्णय घेऊ लागतो. सावधगिरी वेगळी व स्थितिशीलता वेगळी.
तरुण व वृद्ध समोरासमोर आले की त्यांच्या प्रतिसादात फरक पडतो आणि त्याचे काही परिणाम होतात. जगावर आजही जी-८ देशांचेच राज्य आहे. विकसनशील देशांना आपला विकास दर राखण्यासाठी याच देशांच्या मदतीची गरज आहे. आज जी-८ देशांतील राज्यकर्ते तरुण आहेत तर विकसनशील देशात वृद्ध राज्यकर्त्यांची फळी आहे. संपूर्ण आशियातच सरकारचे वय जास्त आढळून येते. जी-८ देशांतील राज्यकर्त्यांना काही झटपट निर्णय अपेक्षित आहेत. भारतासारखे देश त्यांना तत्परतेने प्रतिसाद देत नाहीत. यामुळे संधी हुकतात.
वयामुळे आणखी एक महत्त्वाचा फरक पडतो. वयाबरोबर सत्ता टिकविण्याची वृत्ती वाढीस लागते. धरलेली सत्ता सोडवत नाही. घराणेशाहीचे मूळ तेथे आहे. वय वाढले की आपल्या घराण्यातील तरुणांभोवती सत्ता फिरवत ठेवली जाते. भाजपचा अपवाद करता भारतात राज्याराज्यांत अशा पद्धतीने सत्ता केंद्रित झालेली आढळून येईल. यामुळेही तरुण वर्ग राजकीय प्रवाहापासून दूर राहणे पसंत करतो. जे राजकारणात येतात ते अल्पसंतुष्ट होऊन राहतात. त्यांच्या कर्तृत्वाला बहर येत नाही.
यावर उपाय काय? सत्तेला चिकटून राहण्याची मानवी प्रवृत्ती अमेरिकेच्या स्वातंत्र्य लढय़ातील धुरिणांना चांगली माहीत होती. अमेरिकेचा पहिला प्रमुख म्हणून वॉशिंग्टन याची निवड झाली तेव्हा त्याच्या पदाला काय म्हणावे यावर बरेच महिने चर्चा झाली होती. डोक्यात सत्तेची हवा जाईल अशी कोणतीही बिरुदावली या पदाला असू नये असा आग्रह धरला गेला होता. शेवटी ‘प्रेसिडेन्ट’ हे त्या काळातील अत्यंत साधे नाव त्या पदाला दिले गेले आणि त्याचबरोबर दोन वेळा सत्ता उपभोगल्यावर सक्तीच्या निवृत्तीचे बंधन घालण्यात आले. अशी सक्ती नसूनही ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, कॅनडा या देशांत तरुण वर्ग सातत्याने सत्तेवर येतो आणि त्यानंतर आपापल्या व्यवसायात पुन्हा परतत असतो. सत्ता हा तेथे आयुष्य व्यापणारा व्यवसाय नसतो. भारतात मात्र तो तसा आहे.
सत्तेमध्ये सतत नव्या नव्या लोकांना संधी मिळणे हे भारतासारख्या अफाट लोकसंख्येच्या देशात आवश्यक आहे. वयाच्या साठीनंतर सत्तेच्या पदावर कोणी राहू नये, अशी सूचना नानाजी देशमुख यांनी जनता सरकारच्या काळात केली. ती स्वत: आचरून दाखविली व पुढे वयाच्या नव्वदीपर्यंत सामाजिक कार्य करूनही दाखविले. मात्र अशा धाडसाची अन्य नेत्यांकडून अपेक्षा धरता येत नाही. जनतेच्या दबावाने हे शक्य आहे. दोन किंवा त्याहून अधिक वेळा सत्तेचे पद उपभोगलेल्या तसेच वयाची साठ वर्षे पार केलेल्या उमेदवाराला, मग तो कितीही चांगला असला तरी विजयी करायचे नाही असे जनतेने ठरविले तर बदल होऊ शकतो. देशात चैतन्य आणण्यासाठी अशा बदलाची गरज आहे.

..... जय भारत  जय  महाराष्ट्र  .......