Saturday, September 20, 2014

सहनशीलता

एकदा एक गुराखी चरण्यासाठी जंगलात घेऊन गेला होता. गुरांना चरण्यासाठी सोडून दिल्यावर एकटाच एका झाडाखाली बसला. वेळ घालवण्यासाठी म्हणून जवळच पडलेल्या एका दगडाने दुसऱ्या दगडावर आघात करू लागला. दोन-तीन आघात झाल्याबरोबर तो दगड तुटला व थोडय़ा अंतरावर जाऊन पडला.  गुराख्याने दुसरा दगड घेतला व आता या दगडावरही तो तसेच आघात करू लागला. या दगडाने मात्र ते सर्व घाव सहन केले व आश्चर्याची गोष्ट म्हणजे संध्याकाळपर्यंत त्या दगडाचे एका सुंदर मूर्तीत रूपांतर झाले. त्या गुराखीने ती मूर्ती तेथेच ठेवली व गुरांना घेऊन निघून गेला. रस्त्यावरून जाणाऱ्या शेतमजुरांना जेव्हा ती मूर्ती दिसली तेव्हा त्यांना वाटले की हा तर चमत्कारच झाला. सकाळी तर येथे मूर्ती नव्हती. प्रभूने आपल्यासाठीच ही मूर्ती पाठवली असेल. अवश्य आपणास या मूर्तीसाठी मंदिर बनवावे लागेल, असे म्हणून ग्रामस्थांनी सगळ्यांच्या सहयोगाने तेथे मंदिर बनवून त्यात या मूर्तीची स्थापना केली.
या मूर्तीवर वाहण्यासाठी नारळ फोडायला दगड हवा होता म्हणून एक ग्रामस्थ खाली पडलेला एक दगड उचलतो तर तो तोच दगड असतो जो त्या गुराख्यांच्या फक्त दोन-तीन प्रहारांनी तुटलेला असतो. त्याला मंदिराच्या दरवाजाजवळ ठेवले जाते. आता रोज त्याच्यावर नारळ फोडले जातात. एकदा कुणीही नसताना त्या मूर्तीने अचानक दरवाजातील दगडाला विचारले, 'काय मित्रा, कसा आहेस?' तेव्हा उत्तरादाखल दगड म्हणाला, ''काही नको विचारू बाबा. दिवसभर झालेल्या आघातांना तू सहन केलंस, पण आता तुझी पूजा होते आहे, पण मी मात्र एक-दोन आघातांनी घाबरून गेलो. पण आता मात्र रोजच माझ्या शरीरावर आघात होत आहेत. याचा पश्चात्ताप मला आयुष्यभर राहील.'' कदाचित म्हणूनच म्हटले जाते, 'टाकीचे घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही.' दगडापासून मूर्ती जेव्हा घडत असते, तेव्हा तिला घाव सोसल्याशिवाय देवपण येत नाही. दगडापासून मूर्ती जेव्हा घडत असते, तेव्हा तिला घाव मोठय़ा आनंदाने सहन करावे लागतात. याउलट जे दगड हे घाव न सोसता तुटून पडतात. त्यांचा वापर मंदिराच्या बांधकामात केला जातो. सागराच्या किंवा नदीच्या लाटांशी टक्कर देत देत त्यातील दगडही पूजनीय प्रतिमा शालिग्राम बनतात.
एकदा गौतम बुद्ध आपल्या शिष्यांना म्हणाले, ''मी तुम्हाला एका बिकट कामगिरीसाठी जवळच्या प्रदेशात पाठवणार आहे.  तेथील लोकांना तुम्ही काही सांगितलं व त्यांनी तुमचं ऐकलं नाही तर तुम्ही काय कराल?'' शिष्यांनी उत्तर दिले, ''तथागत, असं झालं तर आम्ही समजू येथील लोक फारच चांगले आहेत. त्यांनी आमचं ऐकून घेतलं नाही हे खरं. पण उलटून शिव्या तर दिल्या नाहीत?'' यावर तथागत म्हणाले, ''ठीक आहे. त्यांनी तुम्हाला शिव्या दिल्या, काही अपशब्द वापरले तर तुम्ही काय कराल?'' शिष्य म्हणाले, ''तरीदेखील आम्ही समजू इथले लोक चांगले आहेत. त्यांनी आम्हाला फक्त  शिव्याच दिल्या, मारहाण तर केली नाही.'' पुन्हा तथागत म्हणाले, ''पण जर त्यांनी तुम्हाला मारलं तर?'' शिष्य म्हणाले, ''आम्ही म्हणू की हे लोक किती चांगले आहेत, कारण यांनी आमचा जीव तर घेतला नाही.'' पुन्हा तथागत म्हणाले, ''समजा, त्यांनी तुमचा जीव घेण्याचा प्रयत्न केला तर?'' शिष्य म्हणाले, ''आम्ही असेच समजू की या प्रदेशातील लोक सज्जन आहेत. त्यांनी आम्हाला भगवंताचं काम करतानाच भगवंताच्या पायापाशी पोहचवलं?'' शिष्याचे हे उत्तर ऐकून तथागत हसले व म्हणाले, ''तुम्ही कसोटीत उत्तीर्ण झालात.'' अशा प्रकारची पराकोटीची सहनशीलता अंगीकारल्यामुळे तुम्हाला कुठेही हमखास यश प्राप्त होईल.
कधी-कधी किरकोळ गैरसमजुतींनी अनेक वर्षांची मैत्री, ऋणानुबंध धोक्यात येतात, केवळ सहनशक्तीच्या कमतरतेमुळे हे घडते. परंतु तुमच्याशी उगाच वैर बाळगणाऱ्या, तुमच्याशी भांडणाऱ्या विरोधकाचाही तुमच्या मधुर शुभभावना व शुभकामनांद्वारे सहनशीलतेचा पाठ तुम्ही शिकवू शकता.सहनशीलतेची शक्ती ही आपली अविनाशी दौलत आहे. ही दौलत प्रत्येकाला वाढवायला हवी. स्वत:च्या कल्याणासाठीच नव्हे तर इतरांच्याही कल्याणासाठी 'विश्वची माझे घर' ही संकल्पना आपणास मान्य आहे. म्हणून आपल्या सर्व आपल्यांसाठी सहनशीलतेची कास धरायचीच. म्हणूनच तर म्हटले जाते-
जो सहन करतो, तोच शहेनशाह बनतो. 

1 comment: